पुणे : ‘स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा सर्रासपणे वापर केला जातो. तरुण पिढीला तंत्रज्ञानाची पूर्णतः माहिती असते, परंतु भवतालच्या घडामोडी, समाजातील प्रतिकूल परिस्थिती याबाबतही माहिती असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तरुणांनाही प्रत्येक गोष्टीतील सत्यता माहिती करून घ्यावी,’ असे मत राष्ट्रीय विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केले.
जयहिंद परिवार आणि लाइफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सव २०१८’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात भरविण्यात आले आहे.
या प्रसंगी दिग्दर्शक निर्माते मुकेश कणेरी, अभिनेत्री देविका दफ्तरदार, चैताली चटर्जी, नृत्यांगना मधुमिता मिश्रा, सतीश खर्डे पाटील, संयोजक नारायण फड, नेहा जोशी, रिटा सेठिया, हसन शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
इदाते म्हणाले, ‘जगात विविध प्रकारची बुद्धिमत्ता असलेली माणसे आहेत. त्यात वाईट माणसे सक्रिय व चांगली माणसे निष्क्रिय आहेत. त्यामुळे चांगल्या माणसांनी पुढाकार घेऊन सकारात्मक गोष्टींचा प्रसार केला पाहिजे. समाजातील गरजूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम नारायण फड यांच्यासारखे करीत आहेत, याचे समाधान आहे. अशा कार्यक्रमातून वंचित घटकांतील लोकांनाही आपल्या कलेला विकसित करण्याची संधी मिळेल.’
देविका दफ्तरदार म्हणाल्या, ‘कला माणसाला जगायला शिकवते. देशभरातून अनेक ठिकाणांहून कलाकार येथे आले आहेत. त्यांच्या कला व त्यांच्याविषयी जाणून घेता आले. कलेचे महत्त्व ओळखून आपण एखादी कला जोपासली पाहिजे.’
नारायण फड यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. रिटा सेठिया यांनी सूत्रसंचालन केले. नेहा जोशी यांनी आभार मानले.